बँक अथवा कोणत्याही वित्तीय सेवेशी कसलाही संबंध नसलेल्या तब्बल २० कोटी लोकांचे आर्थिक समावेशकतेची कामगिरी करून भारताने या आघाडीवर सर्वोत्तम परिणाम दाखवून दिले आहेत, असे मत ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी)’ या जागतिक सल्लागार संस्थेच्या ताज्या अहवालाने व्यक्त केले आहे.देशाच्या आर्थिक प्रगतीत तळागाळातल्या नागरिकांच्या उत्कर्षांला तितकेच महत्त्व देणारी भारताने
केलेली कामगिरी ही अनेक देशांसाठी पथदर्शी ठरणारी आहे, असा शाबासकीचा सूरही या अहवालाचा आहे. बीसीजीच्या २०१६ सालच्या शाश्वत आर्थिक विकास मूल्यांकन अहवालात विविध १६३ देशांच्या वेगवेगळ्या १० निकषांवर लोकांच्या आर्थिक कल्याणाच्या कामगिरीचे मूल्यांकन केले गेले आहे. वित्तीय सर्वसमावेशकतेसह, आर्थिक स्थिरता, आरोग्य, प्रशासन आणि पर्यावरण या निकषांवर तळाच्या नागरिकांच्या हित व कल्याणाला किती महत्त्व दिले गेले याचा अहवालातून आढावा घेतला गेला आहे.
उल्लेखनीय म्हणजे या अहवालात, जनसामाईक कल्याणाच्या दृष्टीने देशाच्या आर्थिक प्रगतीचे योगदान या अंगाने अमेरिकेची कामगिरी जागतिक सरासरीपेक्षा खाली, तर जर्मनीची या आघाडीवरील कामगिरी सरस राहिली असल्याचा अहवालाचा निष्कर्ष आहे. विशेषत: रोजगार निर्मिती व शिक्षणाला चालना या अंगाने पश्चिमेकडील फ्रान्स, इटली, ग्रीस, स्पेन, पोर्तुगाल, सायप्रस, माल्टा आदी पुढारलेले देश अन्य जगाच्या तुलनेत खूप पिछाडीवर पडले आहेत, असा अहवालाचा निष्कर्ष आहे.
No comments:
Post a Comment